सोमवार, २२ ऑगस्ट, २०११


जगतांना जगले स्वच्छंद  
पण अशी नव्हते जगले
तुझ्या मैत्रीत मी 
स्वत:लाच विसरले..

मला माहितीय कधी कधी
खूप दुखावलंय तुला
पण गरज होती त्याची
समजून घे मला..

तुझ्या  ओठी देता हसू
खळखळून मीही हसले
दु:ख देतांना तुला
मी पुरती पिळवटून निघाले..

प्रश्न विचारतांना तुला
उत्तर मला ठाऊक होते
तरीही छळायचे ते मला
म्हणून तुला छेडले होते..

तू फक्त समाधानी रहा
अजून काही सांगणे नाही
तू  फक्त सुखी रहा
बाकी काही मागणे नाही..

नाही कोणताही स्वार्थ अन
नाही कोणतीही आसक्ती
मैत्रीची हवी सोबत मला
हीच पुन्हा दुरुक्ती..

शनिवार, २० ऑगस्ट, २०११


क्वचित..

फुलपाखरे तर सारेच उडतात
फुलावर रंग ठेवणारे क्वचित असतात..

रंग तर सारेच उधळतात
इन्द्र्धनुसारखे मिसळणारे क्वचित असतात..

सूर तर सारेच छेडतात
आयुष्य छेडणारे क्वचित असतात..

हृदयात तर सारेच वसतात
निरंतर वास्तव्य करणारे क्वचित असतात.. 

जीवन तर सारेच जगतात
भरभरून जगणारे क्वचित असतात..

मृत्यूला तर सारेच भिडतात
अमरत्व मिळवणारे क्वचितच असतात..

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०११



"डोळे "

मनाची व्याकुळता कळवितात डोळे..

आनंदाची कारंजी उडवितात डोळे ..

निखार्याची उद्विग्नता भासवितात डोळे ..

हृदयातील चांदणे फुलवितात डोळे  ..

विलक्षण धाक दाखवितात डोळे..

रसिकतेची उधळण करतात डोळे ..

मैफलीला रंग भरतात डोळे..

रंगाचा बेरंग ही करतात डोळे ..

प्रश्नांचा भडीमार करतात   डोळे..

उत्तरासाठी  तिष्टत असतात डोळे..

वात्सल्याच्या सिंधूला साठवितात डोळे..

काळजाची स्पंदन नि:शब्द वदतात डोळे..

वाट पाहण्यातील उत्कटता रेखीतात डोळे ..

आपुलकीची धार  दिसताच बरसतात डोळे..

मनातलं गुपितही खोलतात डोळे..

माणसाला आतल्या जिवंतपणाने जगवितात डोळे..

"आता काहीच उरले नाही "हे कळताच मिटतात ही डोळेचं..

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०११



वेदना..

असं काहीतरी व्हावं 
वेदनेलाही पंख यावेत 
भळभळत्या जखमेलाही
तिने पंखात घेवून जावे..

वेदना ही पाऊस नसावी
जखम जाताच सुकत जाणारी
अशी वेदना मिळावी
शाश्वत क्षणांना ओलावणारी..

जखम जाते पण व्रण राहतोच
जुनं सारचं कुठे आपण विसरतो
सुखद वाटणाऱ्या क्षणांचाही
कालांतराने मग व्रण होतो..

अशी वेदना असावी
खोल खोल तळ गाठणारी
तळाला स्पर्श करूनही
पुन्हा गगनास भेदणारी..

बुधवार, १७ ऑगस्ट, २०११


आयुष्याचं पुस्तक

आयुष्याचं पुस्तक असचं आपण वाचायचं ..!!
सुखाचं पान आलं म्हणून 
मोहरून नाही जायचं.. 
दुःखाच पान   आलं म्हणून
मुळीच नाही कोमेजायचं..
मनाच्या अंतरिक्षात स्तब्ध उभं रहायचं ...१

पुस्तकातील छोट्या मोठ्या प्रश्नांना 
हासत हासत उत्तर द्यायचं..
वाकड्या प्रश्नांना वेळीच ठासून 
उत्तर  देवून निभाऊन न्यायचं..
उत्तर  चुकलं तरीही रडत नाही बसायचं...२

पुस्तकातील अवांतर भागाला 
अजिबात नाही  भुलायचं..
सारांशाकडे जातांना वेळोवेळी
आतल्या आरशात डोकवायचं..
उत्तर योग्य आहे कळताच सृजनाचा वेलू चढायचं ...3